विरोधी पक्षनेत्यांनी केली गडचिरोली जिल्ह्यातील शेतीची पाहणी

विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition Leader Ajit Pawar) सध्या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विदर्भ दौऱ्यावर (Vidarbha Tour) आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात थेट वावरात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे कशाप्रकारे नुकसान झाले या संदर्भातली माहिती घेऊन थेट शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली.

विदर्भात धानाचे (भाताचे) उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. हे उत्पादन करत असताना सुरुवातीला रोपं लावण्याची प्रक्रिया होते आणि त्यानंतर पीक लावलं जातं मात्र पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे धान पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या देखील अजित पवार यांना सांगितल्या. सोबतच जी लोक नियमित कर्ज भरतात, त्या लोकांना 50 हजार रुपये अनुदान देण्याच्या निर्णयाबाबतही शेतकऱ्यांनी अजित पवार यांना विचारणा केली.

गडचिरोलीतील नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत करावी आणि पंचनामे करावेत. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊ नये, पूर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी देखील यावेळी अजित पवारांनी केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दौरा सुरू केलेला आहे. आणि या दौऱ्याची सुरुवात विदर्भातून गडचिरोली जिल्ह्यातून केलेली आहे.

Leave Your Comment